व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

बायबल फक्त एक चांगलं पुस्तक आहे का?

बायबल फक्त एक चांगलं पुस्तक आहे का?

बायबलचं लिखाण होऊन सुमारे २,००० वर्षं पूर्ण झाली. तेव्हापासून असंख्य पुस्तकं आली आणि गेली, पण बायबल मात्र टिकून राहिलं. ते का टिकून राहिलं त्याची कारणं पुढं दिली आहेत.

  • सत्तेवर असलेल्या अनेक लोकांनी बायबल नष्ट करायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, १३ व्या ते १५ व्या शतकांदरम्यान, स्वतःला “ख्रिश्चन” म्हणवणाऱ्या देशांत जो कोणी “स्वतःजवळ बायबल बाळगेल आणि [सर्वसाधारण लोक बोलत असलेल्या भाषेत असलेलं बायबल] वाचेल तो, धर्मत्यागी व राजद्रोही असल्याचं समजलं जायचं,” असं अॅन इंट्रोडक्शन टू द मिडिवल बायबल नावाच्या पुस्तकात म्हटलं आहे. इतर भाषांमध्ये बायबलचं भाषांतर करणारे किंवा बायबलचा अभ्यास करण्याचं उत्तेजन देणारे विद्वान, खरंतर आपला जीव धोक्यात घालत होते. आणि काहींना तर ठारही मारण्यात आलं.

  • बायबलचे अनेक शत्रू होते. तरीपण, ते तेव्हाही टिकून राहिलं, आजही आहे. ते आजपर्यंतचं सर्वात जास्त प्रकाशित होणारं पुस्तक आहे. तत्त्वज्ञान, विज्ञान आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या विषयांवरच्या इतर पुस्तकांचं वितरण मर्यादित होतं आणि काळाच्या ओघात लोक त्या पुस्तकांबद्दल विसरूनसुद्धा गेले. बायबलच्या बाबतीत याच्या अगदी उलट झालं. बायबलच्या काही भागांचं किंवा संपूर्ण बायबलच्याच, २,८०० भाषांत अंदाजे ५०० कोटी प्रती छापण्यात आल्या आहेत.

  • काही भाषा तर अशाही होत्या ज्यांत फार कमी प्रमाणात पुस्तकं किंवा छापील साहित्य होतं. नव्हतंच असं म्हटलं तरी चालेल. पण अशा भाषांमध्ये जेव्हा बायबलचं भाषांतर झालं तेव्हा बायबलमुळे त्या भाषा नामशेष होताहोता राहिल्या आणि त्यांचा जणू काय विकास झाला. मार्टिन लुथरनं जर्मन भाषेत बायबलचं भाषांतर केल्यामुळे, त्या भाषेवर त्याचा बराच प्रभाव पडला. किंग जेम्स व्हर्शन ही बायबलची पहिली आवृत्ती, इंग्रजीत “छापण्यात आलेलं सर्वात प्रभावी पुस्तक आहे,” असं म्हटलं जातं.

  • बायबलचा “पाश्‍चात्य संस्कृतीवर, म्हणजे त्यांच्या फक्त धार्मिक विश्वासांवर व प्रथांवरच नव्हे तर कला, साहित्य, कायदा, राजकारण आणि इतर अनेक क्षेत्रांवरही गहिरा प्रभाव पडला आहे.”—द ऑक्सफर्ड एन्सायक्लोपिडिआ ऑफ द बुक्स ऑफ द बायबल.

बायबल इतर पुस्तकांपासून वेगळं का आहे याची ही झाली तुरळक कारणं. इतरंही अनेक कारणं आहेत ज्यांमुळे ते लोकप्रिय आहे. कोणती कारणं आहेत ती? बायबलसाठी लोक आपला जीवसुद्धा धोक्यात घालायला तयार का होते? पुढे काही कारणं दिली आहेत: बायबलमध्ये उच्च नैतिक दर्जाचं जीवन व्यतीत करण्यासाठी व देवाबरोबर जवळचा नातेसंबंध जोडण्यासाठी अतिशय सुरेख माहिती आहे. मानवांच्या दुःखाचं व त्रासाचं मूळ कारण समजण्यास बायबल आपल्याला मदत करतं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे, बायबलमध्ये असं वचन दिलं आहे, की आपण सहन करत असलेल्या समस्यांचा लवकरच अंत होणार आहे. तो कसा होणार आहे हेही सांगितलं आहे.

बायबलमध्ये नैतिक व आध्यात्मिक समज दिली आहे

आपल्याला शिक्षणाची गरज आहे. “शिक्षणामुळे कदाचित तुमच्या नावाच्या मागे पदव्यांची रांग लागेल पण त्याच शिक्षणामुळे जीवनात तुम्ही योग्य नैतिक निर्णय घ्याल याची खातरी नसते,” असं ओटावा सिटिझन नावाच्या कॅनडातील एका संपादकीय लेखात म्हटलं होतं. हे किती खरं आहे! अनेक उच्च शिक्षित लोक, जसं की व्यापार क्षेत्रातील आणि सरकारी क्षेत्रातील पुढारी फसवेगिरी, लबाड्या, चोऱ्या करतात. यांमुळे “लोकांचा त्यांच्यावरचा भरवसा उडत चालला आहे,” असं एडलमन नावाच्या जनसंपर्क कंपनीनं केलेल्या जागतिक अभ्यासात दिसून आलं.

बायबलमध्ये नैतिक व आध्यात्मिक शिक्षणावर जास्त भर देण्यात आला आहे. “धर्म, नीति व सात्विकता अशा सर्व सन्मार्गाची” ते आपल्याला समज देतं. (नीतिसूत्रे २:९) २३ वर्षांचा स्टीफन, पोलंडमध्ये एका तुरुंगात होता. तुरुंगात असताना त्यानं बायबलचा अभ्यास केला आणि या अभ्यासातून त्याला, बायबलमध्ये दिलेला सल्ला किती व्यावहारिक आहे हे जाणवलं. तो लिहितो: “‘आपल्या आईवडिलांचा मान राखा,’ असं जे बायबलमध्ये म्हटलं आहे ते आता मला समजलं. शिवाय, मी स्वतःवर ताबा ठेवायला, खासकरून माझ्या तापट स्वभावावर नियंत्रण ठेवायलादेखील शिकलो.”—इफिसकर ४:३१; ६:२.

नीतिसूत्रे १९:११ मधील तत्त्व स्टीफनला खासकरून भावलं. त्यात म्हटलं आहे: “विवेकाने [समजबुद्धीने] मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” आता स्टीफनसमोर असा एखादा प्रसंग आला जेव्हा त्याला राग येऊ शकतो तेव्हा तो शांत डोक्यानं विचार करतो आणि त्या प्रसंगी योग्य असलेलं बायबल तत्त्व अनुसरण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो: “बायबल सर्वात उत्तम मार्गदर्शक आहे, याची मला खातरी पटली आहे.”

यहोवाची साक्षीदार असलेली मरीया नावाची एक बहीण अशीच एकदा चालली होती. रस्त्यावर तिला एका स्त्रीनं अडवलं. या स्त्रीला साक्षीदारांबद्दल मनात राग असल्यामुळे ती तिला फार वाईट वाईट बोलली. लोक जमा झाले. पण मरीयानं तिला उलट उत्तर दिलं नाही. ती निमूटपणे तिथून निघून गेली. या स्त्रीला नंतर स्वतःच्याच वागण्याचा पस्तावा झाला. तिने साक्षीदारांचा शोध घेतला. एक महिन्यानंतर जेव्हा मरीया तिला पुन्हा भेटली तेव्हा तिनं तिला मिठी मारली आणि क्षमा मागितली. मरीया तिच्या धार्मिक विश्वासांमुळेच इतकी शांत राहू शकली होती, ते तिला समजलं. याचा परिणाम काय झाला? साक्षीदारांबद्दल मनात पूर्वग्रह असलेल्या या स्त्रीनं व तिच्या घरातील इतर पाच सदस्यांनी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला.

येशूने म्हटलं होतं: “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) बायबलमधील तत्त्वं खरंच उपयुक्त आहेत! या तत्त्वांचं पालन केल्यास आपलं व्यक्तिमत्त्व आणखी सुधारतं. ही तत्त्वं “भोळ्यांस समंजस” करतात, “हृदयाला आनंदित करतात” आणि नैतिक व आध्यात्मिक मार्गदर्शन देऊन “नेत्रांना प्रकाश” देतात.—स्तोत्र १९:७, ८.

मानवांवर दुःख आणि त्रास कशामुळे आले ते बायबलमध्ये सांगितलं आहे

एखाद्या रोगाचा फैलाव होतो तेव्हा, तो कशामुळे झाला याचं कारण संशोधक शोधण्याचा प्रयत्न करतात. मानवाच्या दुःखांचा व त्रासांचा “रोग” का पसरला याचं कारणदेखील बायबलमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आपल्या त्रासांची सुरुवात कुठून झाली अगदी तेव्हापासूनची सविस्तर माहिती त्यात दिली आहे.

बायबलचं पहिलं पुस्तक ‘उत्पत्ति’ यात, मानवजातीच्या दुःखांची सुरुवात आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवांनी देवाविरुद्ध केलेल्या बंडाळीपासून झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी तर, बरोबर आणि चूक हे ठरवण्याचा अधिकारही स्वतःकडेच घेतला. हा अधिकार केवळ आपल्या निर्माणकर्त्याचाच होता. पण या दोघांनी तो स्वतःकडे घेतला. (उत्पत्ति ३:१-७) तेव्हापासून बहुतेक लोक मनमर्जी करत आहेत. याचा परिणाम काय झाला आहे? मानव इतिहासात आपल्याला, स्वातंत्र्य व आनंद यांच्याबद्दल नव्हे तर झगडे, जुलूम, नैतिक व आध्यात्मिक विसंगती पाहायला मिळतं. (उपदेशक ८:९) बायबलमध्ये किती अचूकपणे म्हटलं आहे: “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) पण आनंदाची गोष्ट म्हणजे, हे असंच कायम चालत राहणार नाही. लवकरच देवापासून स्वतंत्र जीवन जगण्याचा मानवांचा अयशस्वी प्रयोग संपणार आहे.

बायबलमध्ये आशा दिली आहे

बायबल आपल्याला असं आश्वासन देतं, की देवाच्या अधिकाराचा व स्तरांचा आदर करणाऱ्यांवर त्याचं प्रेम आहे. त्यामुळे तो दुष्टता व दुःख यांना आणखी खपवून घेणार नाही. दुष्ट जन “आपल्या वर्तनाचे फळ भोगतील.” (नीतिसूत्रे १:३०, ३१) “पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.

“सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” अशी देवाची इच्छा आहे.—१ तीमथ्य २:३, ४.

पृथ्वीला शांतीमय ठिकाण बनवण्याचा देवाचा उद्देश आहे आणि हा उद्देश तो आपल्या ‘राज्याद्वारे’ पूर्ण करणार आहे. (लूक ४:४३) हे राज्य एक जागतिक सरकार आहे. या सरकाराद्वारे तो, मानवजातीवर शासन करण्याचा त्यालाच अधिकार आहे, हे दाखवून देणार आहे. येशूने या राज्याचा संबंध पृथ्वीशी लावत त्याच्या आदर्श प्रार्थनेत असं म्हटलं: “तुझे राज्य येवो. . . . पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.”—मत्तय ६:१०.

या प्रार्थनेनुसार देवाच्या राज्याची प्रजा देवाची इच्छा पूर्ण करेल. अर्थात, ते कोणा मानवाला नव्हे तर निर्माणकर्त्याला आपला शासक म्हणून स्वीकारतील. त्यानंतर भ्रष्टाचार, लोभ, आर्थिक तफावत, जातीभेद आणि युद्ध इतिहासजमा होतील. तेव्हा शब्दशः एकच जग, एकच सरकार, एकच नैतिक व आध्यात्मिक स्तर असतील.—प्रकटीकरण ११:१५.

ते नवीन जग पाहण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शिक्षण घ्यावं लागेल. देवाची “अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे,” असं १ तीमथ्य २:३, ४ मध्ये म्हटलं आहे. या सत्यात, अशा बायबल शिकवणींचा समावेश होतो ज्याला आपण ‘राज्याची घटना’ म्हणू शकतो. म्हणजेच, हे राज्य ज्यांच्या आधारावर चालणार आहे ते नियम व ती तत्त्वं. या नियम व तत्त्वांची उदाहरणं आपल्याला येशूच्या डोंगरावरील प्रवचनात वाचायला मिळतात. (मत्तय अध्याय ५-७) हे तीन अध्याय वाचताना, येशूने दिलेल्या शिकवणींनुसार जेव्हा प्रत्येक जण वागेल तेव्हा जग कसं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता.

बायबल सर्वात जास्त वितरित पुस्तक का आहे, याचा आणखी जास्त पुरावा काय हवा? बायबलमधील प्रत्येक शिकवण देवाकडून आहे, हे स्पष्ट झालं. ते इतक्या भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे आपल्याला एक गोष्ट कळते. ती म्हणजे, सर्व भाषेच्या लोकांना व राष्ट्रांना देवाविषयी शिकता यावं आणि येणाऱ्या त्याच्या राज्याद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादांचा लाभ मिळावा, अशी देवाची इच्छा आहे.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.▪ (g16-E No. 2)